
“बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही!”; अजितदादांचं स्वप्न पूर्ण करणार, स्वातंत्र्यदिनी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड येथे दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावनिक आठवण काढली. तसेच, अजितदादांच्या विकासकामांचे स्वप्न पुढे नेण्याचा संकल्प करत “बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजितदादांच्या आठवणीने भारावलेलं वातावरण

दिग्गज नेते आणि लाडके ‘दादा’ यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळण्यासोबतच बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणानंतर बोलताना त्या म्हणाल्या, दादांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली, त्यावेळी बीडच्या विकासाची अनेक स्वप्नं त्यांच्या मनात होती. ही स्वप्नं आता थांबवायची नाहीत, तर ती पूर्णत्वास न्यायची आहेत.जनतेची साथ आणि सहकार्य लाभल्यास अजितदादांचे बीडच्या विकासाचे स्वप्न १०० टक्के पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

विकासकामांचे भूमिपूजन आणि आरोग्य सुविधांचे लोकार्पण
या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवारांनी बीडमध्ये विकासकामांचा धडाका लावला. कंकालेश्वर मंदिर परिसर: येथील विकासकामांचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बीड जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचे (Cardiac Ambulance) लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. केवळ घोषणा करून प्रशासन चालत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवावे लागते, हा अजितदादांचा विचार पुढे नेत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
कोयत्यापासून पाटी-पेन्सिलपर्यंत: पुढील पिढीच्या भविष्याचा संकल्प
बीडमधील ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नावर बोलताना सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या. शेतात राबणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या भविष्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “ज्या आई-वडिलांच्या हातात आयुष्यभर कोयता राहिला, त्यांच्या मुलांच्या हातात पेन आणि वही yaवी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. शिक्षण आणि विकासाच्या माध्यमातून पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे.”

