
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानसिक तणावाचा आणि प्रशासकीय कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबईत उचलले टोकाचे पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी २७ तारखेला मुंबईतील सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत्युपूर्वीची भावनिक इच्छा
डॉ. रुपनवर यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात अत्यंत भावूक करणारी इच्छा व्यक्त केली. “माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मृत्यूनंतर माझा देह एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशिक्षणासाठी दान करण्यात यावा,” असे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. या जबाबामुळे पोलिसांसमोरील तपासाचे आव्हान वाढले असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
आत्महत्येचे कारण काय?
प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयातील अंतर्गत वाद आणि बदलीच्या मुद्यावरून डॉ. रुपनवर प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांनी याबाबत आपल्या मित्रपरिवाराशी आणि कुटुंबीयांशी चर्चा केल्याचीही माहिती समोर येत आहे.
सुषमा अंधारे यांचा संतप्त सवाल
या लागोपाठच्या घटनांनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “फलटणच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडत आहे? तिथल्या डॉक्टरांवर वारंवार मानसिक तणाव का निर्माण होत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत आपल्या मुलाच्या मृत्यूला न्याय मिळत नाही आणि सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. दरम्यान, या वाढत्या दबावानंतर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जे. जे. मधून पूर्ण केले होते शिक्षण
डॉ. राजेंद्र रुपनवर हे अत्यंत हुशार आणि होतकरू तरुण होते. त्यांनी मुंबईतील नामांकित जे. जे. मेडिकल कॉलेजमधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ते फलटण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा बजावत होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने वैद्यकीय क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

