Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणेशाहीत अडकलेला पक्ष

जनतेला खरा पर्याय आम आदमी पार्टीच देऊ शकते, पुण्यात स्वराज्य यात्रेनिमित्त जाहीर सभा

पुणे दि ३(प्रतिनिधी)- “ज्यांना पैसे कमवायचे आहेत, ठेकेदार बनायचं आहे ते लोक भाजपमध्ये जातात. ज्यांना केवळ पद हवय ते लोक काँग्रेसमध्ये जातात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे देशाची सेवा करायची ते लोक आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते बनतात. जनतेला खरा पर्याय आम आदमी पार्टीच देऊ शकते”, असे मत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया यांनी पुण्यात झालेल्या स्वराज्य सभेमध्ये व्यक्त केले.

आपने सुरु केलेली स्वराज्य यात्रा पुण्यात आल्याने पक्षाकडून जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी इटालिया यांनी पक्षातील नेत्यांनी सभेला संबोधित केले. “पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षात शहराचे वाटोळे केले. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला. नागरिकांचे कोणतेही प्रश्न सुटण्यास भाजपच्या राजवटीचा फायदा झाला नाही. पुणेकर नागरिक येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा जाब विचारतील. कसब्यापासून सुरू झालेले भाजप विरोधी वातावरण संपूर्ण पुण्यात पसरेल”, असं मत पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी व्यक्त केले. पुण्यामध्ये आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा रॅली देखील पार पडली. आझम कॅम्पस येथून सुरू झालेली ही रॅली पावर हाऊस, लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता मार्गे हिराबाग चौकात आली आणि हिराबाग चौक येथे जाहीर सभा पार पडली. या यात्रेचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव व राज्य सहप्रभारी गोपाल इटालीया आणि पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केले. यावेळी मंचावर मुकुंद कीर्दत, संदीप देसाई, संदीप सोनवणे, सुनीता काळे हे उपस्थित होते. अभिजीत गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी जनसामान्यांपर्यंत पोहचत आहे. दिल्ली, पंजाब, गोवा व गुजरात येथे मिळालेल्या मतदारांच्या पाठिंब्यामुळे पक्ष स्थापनेच्या एका दशकातच आम आदमी पार्टी एक राष्ट्रीय पार्टी बनली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील राज्य समिती व विभागीय समित्या बरखास्त करून संघटनात्मक पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

महाराष्ट्रामध्ये स्वराज्य यात्रेची सुरुवात २८ मे रोजी भक्ती स्थळ पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन ६ जून राज्याभिषेक दिनी शक्तिस्थळ रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. पुण्यामध्ये येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी आपलं वर्चस्व सिद्ध करेल असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!