![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला धुळ चारत काँग्रेसची सत्ता
राष्ट्रीय अध्यक्षाच्या राज्यात भाजप पराभूत, आपच्या हाती भोपळा
शिमला दि ८ (प्रतिनिधी)- हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळत सत्ता खेचून आणली आहे. हिमाचल प्रदेशात दर विधानसभा निवडणुकीत सरकार बदलण्याची प्रथा कायम असल्याचे दिसते. यंदा काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. या ठिकाणी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा झटका बसला आहे. पण भाजप या ठिकाणी आॅपरेशन लोटस राबवण्याची शक्यता असल्याने काॅंग्रेसकडुन खबरदारी घेतली जात आहे.
हिमाचल प्रदेशमधील ६८ जागांपैंकी काँग्रेसने ३९ जागा जिंकत सत्ता ताब्यात घेतली आहे. राजस्थान नंतर काँग्रेसची स्वबळावर सत्ता असणारे हिमाचल प्रदेश दुसरे राज्य असणार आहे. भाजपाने या ठिकाणी २६ जागा जिंकल्या आहेत पण सत्ता राखण्यात भाजपाला यश मिळालेले नाही तर विजयाचा दावा करत हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत एंट्रि घेतलेल्या आपला भोपळाही फोडता आला नाही. अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाला बंडखोरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हिमाचलचे आहेत तरी देखील भाजपाला सत्ता राखण्यात अपयश आले आहे. तर काँग्रेसने या निवडणूक पूर्णपणे स्थानिक नेत्यांना हातात दिली होती. त्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसला सत्ता हस्तगत केल्यानंतर सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसकडुन तीन नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये सुखविंदर सिंह सखू, मुकेश अग्निहोत्री आणि प्रतिभा सिंग यांच्या नावाची चर्चा आहे.आता मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.हिमाचल प्रदेशमध्ये बहुमताकडे घेऊन जाणारी मोठी आघाडी मिळाल्यानंतर कॉंग्रेसनं विजयी आमदारांना छत्तीसगड किंवा राजस्थानमध्ये हलवण्याची तयारी सुरू केली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये १० ते १५ जागांचं अंतर असल्यामुळं भाजपनं सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. त्यासाठीच महाराष्ट्र भाजपमधील नेते आणि भाजपचे महासचिव विनोद तावडे हे हिमाचल प्रदेशसाठी रवाना झाले आहेत. तावडे हे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सत्तास्थापनेचं गणित जुळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसही सतर्क झाली आहे.