
महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! पुढील ४-५ दिवस पाऊस नाही पण….; ‘परतीच्या पावसा’बाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज
राज्यात हवामानात सातत्याने मोठे बदल होत असून बळीराजा दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने चिंता वाढली आहे. त्यातच “पुढील ४ ते ५ दिवस राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही,” असा मोठा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे आणि कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली (Weather System) सक्रिय नसल्याने बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

एल निनोचा प्रभाव; पण परतीचा पाऊस तूट भरून काढणार?

पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “सध्या मॉन्सूनचे वारे कमकुवत झाले असून एल निनोचा वाढता प्रभाव जाणवत आहे. मात्र, असे असले तरीही परतीच्या पावसात ही तूट भरून निघेल,” असा दिलासादायक अंदाज एस. डी. सानप यांनी वर्तवला आहे.

धरणांमधील पाणीसाठ्यात घट; पिके धोक्यात
सध्या मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतातील पिके करपू लागली असून पिकांना तातडीने पाण्याची गरज आहे. अनेक जिल्ह्यांमधील धरणांच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याने पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असल्याने, आता सर्वांच्या नजरा परतीच्या पावसाकडे आणि हवामान विभागाच्या पुढील अपडेट्सकडे लागल्या आहेत.

