
सावधान! वाहतुकीचे नियम तोडताय मग ही बातमी वाचाच!
नियम मोडल्यास खिशाला जोरदार फटका बसणार, नवे दंड पाहून डोळे पांढरे होतील
पुणे – पुण्यातील वाढत्या वाहतूक समस्यांमुळे वाहतूक पोलिसांनी नियम अधिक कठोर केले आहेत. नवीन नियमांनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दहापट दंड आकारण्यात येणार असून काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा देखील लागू करण्यात आली आहे.
नवीन नियमानुसार वाहनचालकांनी मद्यप्राशन करून गाडी चालवल्यास यापूर्वी १,००० रुपये दंड होता. मात्र आता हा दंड १०,००० रुपये इतका वाढवण्यात आला आहे. यासोबतच ६ महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची शक्यता आहे. यापूर्वी १०० रुपये दंड सीटबेल्ट न घालता वाहन चालवणे आणि दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास केल्यास होता. परंतु, आता १००० रुपये दंड आकारला जाणार आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास १००० रुपये दंड किंवा तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्यात येईल. विमा नसलेल्या वाहनांसाठी अगोदर २०० ते ४०० रूपये दंड होता. पण आता २००० रुपये आणि दुसऱ्यांदा ४००० रुपये दंड आकारला जाईल. तसेच ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शक्यता आहे. सिग्नल तोडणे, अतिवेगाने वाहन चालवणे, परवाना नसताना गाडी चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास ५००० हजार दंड आकारला जाणार आहे. अगोदर तो दंड ५०० रूपये होता. जर एखाद्या अल्पवयीन मुलाने वाहन चालवले तर त्याच्या पालकांना २५००० हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच ३ वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा आणि १ वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द केली जाऊ शकते. वाहनचालकांनी हे नवीन नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना नियम पाळणे अत्यंत गरजेचे बनले आहे. नाहीतर मोठा आर्थिक फटका बसू शकतो. हे नियम १ मार्चपासून अमलात आले आहेत.
वाहतूक नियम दंडात आता दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीचे उद्दिष्ट निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या वर्तनांना आळा घालणे आणि देशभरातील रस्ते सुरक्षा वाढवणे हे आहे.