
पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली आहे. या निर्णयामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनाला आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात लागू असलेली आचारसंहिता आता पुढील एक-दोन दिवसांतच शिथिल होणार आहे. परिणामी, आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली महापालिकेची महत्त्वाची कामे आणि बैठका पुन्हा नियमित सुरू होणार आहेत.

आचारसंहितेमुळे पालिकेचे कामकाज झाले होते ठप्प

या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हते. तातडीच्या कामांसाठी बैठका घेण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असली, तरी कोणत्याही ठोस निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यास मज्जाव होता. जर निवडणूक झाली असती, तर पालिकेला जून महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागली असती आणि तोपर्यंत पालिकेचे कामकाज जवळपास ठप्पच राहिले असते.

पाणीकपात आणि पालखी सोहळ्याचे निर्णय रखडले!
आचारसंहिता शिथिल होणार असल्याने पुणेकरांच्या थेट जगण्याशी संबंधित असलेल्या अनेक महत्त्वाच्या विषयांचा मार्ग आता मोकळा होणार आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणी देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. या धोरणात्मक निर्णयासाठी सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय प्रमुखांची तातडीची बैठक आता घेतली जाईल.जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यात पालखी सोहळा येत आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तातडीच्या कामांच्या निविदा आचारसंहितेमुळे अडकल्या होत्या, त्या आता खुल्या होतील.पावसाळ्यातील तातडीच्या आणि पावसाळापूर्व कामांचे अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होते, त्यांना आता गती मिळेल.
सोमवारनंतर पालिकेचे काम ‘फुल स्पीड’मध्ये सुरू होणार!
पुढील आठवड्यात सोमवार (दि. ८) नंतर महापालिकेचे सर्व कामकाज नियमितपणे सुरू होणार आहे. प्रशासकीय बैठकांचा धडाका पुन्हा पाहायला मिळेल.
महापालिकेने घेतलेल्या अभियंत्यांच्या भरती प्रक्रियेचा निकालही आचारसंहितेमुळे रखडला होता. आता आचारसंहिता शिथिल होताच पुढील काही दिवसांतच हा निकाल जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे.एकंदरीत, विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणे हे पुणे महानगरपालिका आणि रखडलेल्या विकासकामांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे.

