
मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला!; “ओबीसी मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या सुना…”, नवनाथ वाघमारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ!
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत “आता मेलो तरी माघार घेणार नाही,” अशी टोकाची भूमिका घेतली आहे. दुसऱ्या बाजूला, या मागणीला ओबीसी नेत्यांकडून तीव्र विरोध होत असून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा आझाद मैदानावर धडकण्याचा इशारा

मनोज जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. मोठ्या संख्येने ओबीसी समाजाला सोबत घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर धडक देणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे म्हणाले ओबीसी आमचा डीएनए मानणारे सरकार सर्रास बोगस कुणबी प्रमाणपत्रे वाटली जात असताना शांत का आहे? एकाच व्यक्तीच्या दबावाला बळी पडणाऱ्या सरकारला ५०-५५% ओबीसी समाजाची गरज उरलेली नाही का? जितका ओबीसी समाज एकत्र येईल, त्या सर्वांना घेऊन आम्ही आझाद मैदानाकडे निघणार आहोत आणि सरकारला थेट जाब विचारणार आहोत.

वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ असा वाद निर्माण होऊ नये म्हणून संयमाची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नवनाथ वाघमारे यांनी थेट मंत्र्यांच्या नातेसंबंधांवर बोट ठेवत अत्यंत वादग्रस्त विधान केले.
त्यांच्या वक्तव्यातील प्रमुख मुद्दे:
मंत्र्यांच्या भूमिकेवर सवाल: अनेक ओबीसी नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या घरात मराठा समाजातील सुना आणि बायका आल्यामुळे ते सगेसोयरे झाले आहेत. त्यामुळेच हे मंत्री ओबीसी समाजाच्या हितासाठी आक्रमकपणे बोलत नाहीत.
स्पष्ट भूमिकेची मागणी: “जर मराठ्यांशी सोयरिक झाल्यामुळे हे मंत्री ओबीसींचे वाटोळे करणार असतील, तर त्यांनी समोर येऊन स्पष्ट सांगावे की आम्हाला गरीब ओबीसींशी काही देणेघेणे नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला हा नवा वाद आणि ओबीसी नेत्या आझाद मैदानावर आंदोलनाचा दिलेला इशारा यामुळे येत्या दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

