
एक प्रामाणिक आणि कडक अधिकारी काय करू शकतो, हे अन्न व औषध प्रशासनाची धुरा हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण महाराष्ट्रभर भेसळखोर आणि माफियांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आता साईबाबांच्या शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर प्रशासनाने मोठी टाच आणली आहे.

साईभक्तांच्या तक्रारीनंतर ‘FDA’ खडबडून जागे

दररोज हजारो आणि वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. मंदिराच्या बाहेरील खाजगी दुकानांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने पेढा प्रसाद खरेदी करतात. मात्र, काही साईभक्तांनी थेट बुरशीयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांबाबत तक्रारी केल्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासन तातडीने ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे.

पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट गायब!
शिर्डीत सुरू असलेल्या या बोगस प्रकाराबाबत तपास केला असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुकानांमध्ये मिळणाऱ्या पेढा प्रसादाच्या बॉक्सवर कोणतीही मॅन्युफॅक्चरिंग (तयार केल्याची) तारीख, एक्सपायरी डेट किंवा हा पेढा नेमका कुठे बनवला जातो, याचा कोणताही उल्लेख नसतो.अक्षरशः दगडासारख्या कडक आणि काही ठिकाणी बुरशी लागलेल्या पेढ्यांची विक्री सर्रासपणे सुरू होती.श्रद्धेच्या नावाखाली गोरगरीब भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना शिर्डी नगरपालिका आणि स्थानिक अन्न प्रशासनाने याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विक्रेते आणि उत्पादकांवर थेट कारवाई
शिर्डीत बोगस पेढा प्रसाद विक्री होत असल्याची बातमी समोर येताच, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी थेट शिर्डीतील दुकानांमध्ये दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांनी विविध दुकानांमधून पेढे आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने जप्त केले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत (Lab) पाठवले आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर आणि उत्पादकांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अख्ख्या महाराष्ट्रात धाबे दणाणले; ८.५७ कोटींचा साठा जप्त, ३३ जणांना अटक!
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली केवळ शिर्डीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. राज्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात राबवलेल्या धडक मोहिमेत आतापर्यंत तब्बल ८ कोटी ५७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त सुपारी, खाद्यतेल, गूळ, खवा आणि एनर्जी ड्रिंक्सचा समावेश आहे. या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या ३३ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, “आता सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश ‘एफडीए’ने दिला आहे.

