
राज्यात विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या १७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, अहिल्यानगर येथील जागेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या जागेवर आता भाजपने दावा केला असून ही जागा भाजपच लढवणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या जागेवर उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा

राहुरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन दिवसांत तनपुरे हे भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, तनपुरे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे भाजपमधील इच्छुकांमध्ये आणि निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

निष्ठावंत सत्यजित कदम यांचा थेट विरोध
देवळाली प्रवाराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी राहुरी पोटनिवडणुकीत पक्षासाठी त्यांनी अक्षय कर्डिले यांच्या समर्थनार्थ माघार घेतली होती. त्यामुळे आता निष्ठावंत म्हणून आपल्याला संधी मिळावी, अशी कदम यांची मागणी आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीवर उघड नाराजी व्यक्त करताना सत्यजित कदम म्हणाले, “प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाला माझा कोणताही विरोध नाही. मात्र, त्यांना पक्षात घेऊन थेट उमेदवारी देण्याला माझा तीव्र विरोध आहे. पक्षाने इतकी वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांचाही विचार करायला हवा.”
‘एबी फॉर्म नाही दिला तरी चालेल, पण…’
सत्यजित कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पुढे म्हटले की, “मला पक्षाने अधिकृत एबी फॉर्म नाही दिला तरी चालेल, मात्र मला निवडणूक लढण्याची परवानगी द्यावी.” या संपूर्ण वादावर आणि आपल्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी कदम हे लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे.
भाजप या जागेवर आयात उमेदवाराला संधी देणार की निष्ठावंतांना न्याय मिळणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

