Latest Marathi News
Ganesh J GIF

शेतकरी संकटात असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा

अवकाळी व गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना आधी मदत द्या त्यानंतरच मंत्र्यांचे दौरे करा, आरक्षणप्रश्नी मंत्र्यांचा वाद हा ठरलेला कार्यक्रम

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी करत आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ देखावा आहे. मंत्र्यांनी दौरे करावेत पण आधी शेतकऱ्याच्या हातात भरीव मदत द्या, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामही वाया गेला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे, शेतातील उभी पिके, द्राक्ष, संत्रा, कांदा, सोयाबिन, तूर, धान, कापूस सर्व पिकं वाया गेली आहेत. शेतकरी संकटात असताना सरकारने तात्काळ मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहवण्याचे काम केले पाहिजे पण सरकार मात्र पोकळ घोषणा करत आहे. याआधी जाहीर केलेली मदतही शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहचलेली नाही. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांचे खिसे भरले आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, टोकाचे पाऊल उचलू नये. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करत राहिल. राज्यात मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपानेच आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण आता ते आरक्षण देण्यास चालढकल करत आहेत. आरक्षण प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम भाजपा करत आहे. आरक्षण प्रश्नावरून मंत्रीमंडळातील मंत्र्यांची भांडणे ही सुद्धा सरकारचा ठरवून सुरु असलेला कार्यक्रम आहे. ही सर्व नौटकी सुरु असून राज्यातील जनतेला हे माहित आहे. सर्व जातींना आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे, त्यासाठी जातनिहाय जनगणना केली पाहिजे पण भाजपा सरकार ही जनगणना करत नाही.

राज्यात १.२५ लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत पण सरकार त्या जागांची भरती करत नाही. भाजपा सरकार जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करत आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नावाने आदर्श शाळा उपक्रमाची घोषणा करत आहे, हा सर्व हास्यास्पद प्रकार आहे. शाळेत शिक्षकच नाहीत तर आदर्श शाळा कसली? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, तेलंगाना व मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून येथे काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!