म्हणून समीरने पत्नी आरती आणि अडीच वर्षाच्या मुलाचा केला खून
दुहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ, खून करून दिली पोलिसांना माहिती
ओैरंगाबाद दि ९ (प्रतिनिधी)- औरंगाबाद मधील कांचनवाडी भागात चारित्र्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित पतीने आपलाच पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपीने स्वतः खून करुन ही माहिती पोलिसांना दिली. आरोपीच्या आईचाही यामध्ये समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील कांचनवाडी परिसरात समीर विष्णू म्हस्के आपली पत्नी आरती म्हस्के आणि मुलगा निशांत म्हसके सह राहत होता. समीर आणि पत्नी आरतीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. आरतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करायचा. मागच्या दोन महिन्यापासून पती-पत्नीमध्ये संशयाच्या कारणावरून भांडणे होत होती. समीरसोबत भांडण झाल्यामुळे आरती ही आपल्या आई-वडिलांकडे राहण्यास गेली होती. पण, समीर रात्री उशिरा घरी गेला आणि तिच्याशी वाद घालू लागला. त्याने संतापच्या भरात मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. दरम्यान घटना घडल्यानंतर आरोपीने पहाटे पोलिसांना आपण खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा आणि अडीच वर्षाच्या बाळाचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या प्रकरणी संतोष सुतार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यानुसार समीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.