मिरज दि ७(प्रतिनिधी)- मिरज तालुक्यातील बामणोली येथील सुनंदा कुमार जाधव या विवाहित महिलेचा घरगुती वादातून पतीनेच डोक्यात बांबूने जोरदार वार करत खून केला आहे. सतत वाद होत असल्याने पतीने पत्नी सुनंदाचा खून केला. पण त्यानंतर त्याने पळ काढला होता.पण पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
कुमार भीमराव जाधव या आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बामणोली येथील दत्तनगर भागात कुमार जाधव हा पत्नी आणि तीन मुलींसह भाड्याच्या घरात राहत होता. तो एमआयडीसीत एका कारखान्यात काम करत होता. हमाली करीत होता. त्याचे पत्नी सुनंदा बरोबर आणि घरगुती कारणावरून व माहेरहून पैसे आणण्यावरुन वाद होत होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे पती कुमार याने पत्नी सुनंदा हिला घरातून फरफटत घराबाहेर अंगणात आणून बांबूने डोक्यात जोरदार हल्ला केला.यात ती जागीच ठार झाली. पण तिला रूग्णालयात दाखल करताना ती फरशीवरून पाय घसरून पडल्याने जखमी झाल्याचे सांगितले. पण ती मृत झाल्याचे समजताच पती कुमार जाधव याने रुग्णालयातून पळ काढला.
डाॅक्टरांनी या घटनेची माहिती कुपवाड एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, हवालदार गजानन जाधव, संदीप पाटील, सतीश माने, महादेव नागणे यांनी तातडीने संशयित कुमार जाधव याचा शोध घेऊन त्याला गजाआड केले आहे.