![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
पुण्यात एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ७ जणांचे निलंबन
दर्शना पवार हत्या, आणि कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर, कायदा सुव्यवस्था सुधारणार?
पुणे दि ३ (प्रतिनिधी)- दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांवर चाप लावण्यासोबत पुणे पोलिस आयुक्तांनी कर्मचार्यांवरही कारवाईचा आसूड ओढला आहे. पुन्हा एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ७ पोलिस कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे चर्चा होत आहे.
पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्या निलंबनानंतर आता वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडु सायप्पा हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलिस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलिस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर, पोनिस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. योग्यरित्या मोक्का कारवाई केली नाही, परिसरातील दारुची दुकानं बंद केली नाहीत, अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, आरोपींविरोधात कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे या सगळ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचार्यांना निलंबन करण्यात आले होते. यापूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरुगेट पोनिस चौकीच्या पोलिस कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी पुण्यातील सहकारनगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी बाकी सगळ्या पोलिसांची चौकशी केली त्यानंतर आणखी सात जणांवर कारवाई केली आहे. सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्यानंतर पेरुगेट पोलिस चौकीत एकही पोलिस कर्मचारी उपलब्ध नव्हते त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच संतापले होते. त्यानंतर कारवाईला वेग आला.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर पुण्यातील इतर पोलिसांवरही आयुक्तांची करडी नजर असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात कसूर आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यानंतर पुण्यातील कायदा सुव्यवस्था सुधारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.