
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. या राजकीय घडामोडींनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर आता उद्धव ठाकरे यांनी थेट धाराशिवच्या स्थानिक राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, आज मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानी धाराशिवमधील नगरसेवकांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

६ खासदारांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये ठाकरे गटाच्या ९ खासदारांपैकी तब्बल ६ खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर पोहोचली, तर ठाकरे गटाकडे केवळ ३ खासदार उरले.या फुटीमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. सुरुवातीला ओमराजे यांच्या भूमिकेबाबत अनिश्चितता होती, मात्र अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली. खासदार ओमराजेंच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये जाहीर सभा घेऊन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

‘मातोश्री’वरील बैठकीत शक्तीप्रदर्शन! कोणाकडे किती ताकद?
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमधील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक नेमके कोणाच्या बाजूने आहेत, याबद्दल विविध चर्चा सुरू होत्या. आज ‘मातोश्री’वर होणाऱ्या या बैठकीला धाराशिवमधील किती नगरसेवक उपस्थित राहतात, यावरून स्थानिक पातळीवर ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी किती ताकद आहे? उद्धव ठाकरे यांच्यासोबत किती निष्ठावंत नगरसेवक ठाम आहेत? हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या बैठकीला राजकीय दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
धाराशिवच्या राजकारणाला नवी दिशा?
धाराशिव हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला आहे. खासदार शिंदे गटात गेल्यानंतर आता स्थानिक पातळीवरील नगरसेवक आणि पदाधिकारी कोणाला पाठिंबा देतात, यावर धाराशिवच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः धाराशिवमध्ये काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

