‘पहाटेचा तो शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच’
फडणवीसांचा गाैप्यस्फोट, शरद पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हा...
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन आता भाजप शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले आहे. पण राज्यातील राजकारणात अजूनही तो पहाटेचा शपथविधी चर्चेत असतो. तीन वर्षानंतरही त्याची चर्चा आहे. याच्यावर पुस्तके देखील लिहिण्यात आली आहेत. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीवर खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात दीड दिवसाचं सरकार स्थापन झाले होते. या शपथविधीवर अनेक नेत्यांनी वेगवेगळी विधाने केली आहेत. पण आता मात्र खुद्द फडवणीस यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली आहे. फडणवीस म्हणाले. “त्या शपथविधीबाबत आमची चर्चा पवारसाहेबांशी झालेली होती. बाकी सगळ्या गोष्टी अजित पवारांना विचारा, मला का विचारता.” यानंतर अजित पवार याबाबत बोलणं टाळतात, त्यामुळे तुम्हीच सांगा असे विचारण्यात आले. त्यावर त्यांनी “ज्यावेळी अजित पवार बोलतील त्यानंतर मी सविस्तर सांगेन,” असा दावा फडणवीस यांनी केला आहे. या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शपथविधीत उपमुख्यमंत्री बनलेले अजित पवार यांनी मात्र थेट विधान केलेले नाही. मला जेंव्हा योग्य वाटेल तेंव्हाच मी बोलेन असे विधान पवार यांनी केले आहे.
फडणवीस यांनी असा दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले, ‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असं मला कधी वाटलं नाही.’ त्यामुळे आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.