
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना भीषण संघर्ष करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील आगार तांडा येथील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आणि शासनाच्या उदासीनतेविरोधात एक अनोखे अन् जळजळीत आंदोलन छेडले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात “हे गाव आणि गावातील सर्व सरकारी योजना विकणे आहे असा उपरोधिक फलक लावून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

पावसाळ्यात संपर्क तुटतो; शिक्षण टांगणीला!

आगार तांडा येथील परिस्थिती अत्यंत बिकट असून दररोजच्या जगण्यासाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावात जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिकांना रोज तब्बल ५ किलोमीटर पायी चालावे लागते.स्वातंत्र्याला एवढी वर्षे उलटूनही या तांड्यावर आजपर्यंत एकही एसटी बस पोहोचलेली नाही.पावसाळ्यात चिखल आणि दळणवळणाची साधने नसल्याने या तांड्याचा संपर्क तुटतो. परिणामी, लहान विद्यार्थ्यांचे वर्षभरात सुमारे १ ते दीड महिना शिक्षण बंद राहते.

“आश्वासनांचा पाऊस, पण विकासाचा थेंब नाही!”
“लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पाडतात, मात्र प्रत्यक्ष विकासाचा एक थेंबही आगार तांड्यापर्यंत पोहोचत नाही. जर सरकार मूलभूत सुविधा देऊ शकत नसेल, तर आमचे गाव आणि योजना विकायला काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही!”
– संतप्त आंदोलक (आगार तांडा)
अभिजित दिपके यांना आंदोलकांचे आवाहन
या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके यांनाही विशेष आवाहन केले आहे.दिपके यांनी केवळ पेपरफुटीच्या मुद्द्यावरच नाही, तर खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही लढा दिला पाहिजे.गावात पहिलीची शाळा उपलब्ध नसल्याने लहान मुलांना ३ ते ४ किलोमीटर पायी जावे लागत आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

