
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या वादावरून आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.”असं वक्तव्य जनता सहन करणार नाही. कोणाबद्दल काय बोलायचं याचं भान ठेवायला हवं,” अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांना फटकारलं.प्रसारमाध्यमांशी बोलताना शाहू महाराज यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची गरज असल्याचं स्पष्ट केलं. “सरकारला योग्य वाटेल ती कारवाई तात्काळ व्हायला हवी. आमदारकी रद्द करण्याचे नियम काय आहेत हे माहित नाही, पण अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात योग्य नाही,” असे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना संजय गायकवाड यांनी फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर केल्याचा आरोप करत त्यांनी आंबी यांच्याशी अत्यंत आक्रमक भाषेत संवाद साधल्याचे सांगितले जात आहे.

या संदर्भात प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवलेला नसून “कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय कळवू,” असे सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, गायकवाड यांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


