
पंकजा मुंडेंसाठी थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी! ‘या’ नेत्याच्या विधानाने महायुतीत खळबळ; नवा राजकीय पेच?
नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर न झाल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत, “महिलांबद्दल खरंच आस्था असेल तर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा,” असे विधान केले.त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “नारीशक्ती वंदन हे केवळ ढोंग आहे. महिलांना खऱ्या अर्थाने सत्तेत स्थान द्यायचं असेल तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदावर महिला नेत्यांना संधी द्यावी.” त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवरही टीका करत, “देशाची स्थिती बिघडली आहे,” असा आरोप केला.दरम्यान, भाजपकडून या विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबई आणि पुण्यात जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केले. “महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी दिलासा देण्यासाठी ठाकरे यांनी विधान परिषदेत जाणं गरजेचं आहे,” असे ते म्हणाले. तसेच सुप्रिया सुळे यांनीही ठाकरे यांनी आघाडीचे नेतृत्व करावे, अशी भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.


