मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवे पतधोरण शुक्रवारी जाहीर केले. रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर रेपो दर ५.४० टक्के झाला आहे. आरबीआयने या वर्षी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे.
मे महिन्यापासून रेपो दरात एकूण १.४० टक्के वाढ झाली आहे, जी गेल्या अडीच वर्षांतील सर्वोच्च आहे. महागाईला आवर घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर बँका गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून कर्ज महाग केली जाणार आहेत.याचा मोठा फटका ज्यांनी अलीकडच्या काळात बँक किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून गृहकर्ज घेऊन घर खरेदी केले आहे.अशा लोकांना बसणार आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने तो आता ५.४० टक्के झाला आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांत आरबीआयने कर्ज १.४० टक्क्यांनी महाग केले आहे. त्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर सरासारी ८.२५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांच्या खिशाला अधिकचा बोजा पडणार आहे.
ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर म्हणजे रेपो रेट होय. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. जर आरबीआयने रेपो रेट वाढवला तर बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर देखील कमी होत असतो.