मुंबई प्रतिनिधी – एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना कशा पद्धतीने गुजरातला नेलं, याचा पहिला प्रसंग समोर आला आहे. शिवसेनेचे उस्मानाबाद येथील आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदेच्या गळाला लागले होते. मात्र शिंदेचा मनसुबा आणि त्यांचा डाव कळताच कैलास पाटील मोठ्या शिताफिने त्यांच्या तावडीतून निसटले. त्यांनी तिथून थेट मातोश्री गाठली आणि आपल्यासोबत घडलेला सगळा प्रसंग शिवसेना पक्षनेतृत्वासमोर कथन केला.
विधान परिषद निवडणूक संपल्यावर साहेबांनी आपल्याला जेवायला बोलाविले आहे, असं सांगून आमदार कैलास पाटील यांना एका खासगी गाडीतून मुंबई बाहेर नेण्यात आले. ठाण्यापासून सुमारे ४० किमी पुढे गाडी गेल्यानंतर काहीतरी गडबड आहे, हे कैलास पाटील यांच्या लक्षात आलं. मात्र जसंही आपली दिशाभूल केली गेलीय, असं त्यांना कळालं. त्याच क्षणी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत त्यांना हुलकवणी दिली.
मला लघुशंकेला थांबायचं आहे, असं त्यांनी गाडीच्या ड्रायव्हराला सांगितलं. त्यानंतर ते गाडीतून उतरले. अंधाराचा फायदा घेऊन ते तिथून पसार झाले. जीव धोक्यात घालून कैलास पाटील यांनी संबंधित सर्वांनाच गुंगारा देत रात्रीच्या अंधारात गुजरात महाराष्ट्र बॉर्डर जवळीत एका अज्ञात ठिकाणाहून भर पावसात 4 किमी पायी आले. त्यानंतर मिळेल त्या गाडीने त्यांनी मुंबई गाठली. पायी चालत, तसेच त्यानंतर दुचाकीवर एका व्यक्तीकडून त्यांनी लिफ्ट घेतली. आणि नंतर ट्रकने दहिसरला पोहोचले. कैलास पाटील यांनी रातोरात मुंबई गाठली. खुद्द आमदार कैलास पाटील यांनी हा किस्सा शिवसेना नेतृत्वाला सांगितला.
आमदार कैलास पाटील हे शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार झाले आहेत. त्यांची पक्ष निष्ठा पाहून शिवसेनेने त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. कालच्या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झालेल्या असताना कैलास पाटील यांनी फितुर न होता पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे शिवसेना नेते त्यांचं कौतुक करत आहेत.