
‘मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो’
मुंबईत मराठी माणसावर गुजरात्यांची दादागिरी, मनसेने जाब विचारताच मागितली माफी, व्हिडिओ व्हायरल
मुंबई – महाराष्ट्रात आता मराठी भाषा आणि मराठी माणसाची गळचेपी होताना दिसत आहे. अगोदर मराठी भाषा बोलण्यास नकार देणारे परप्रांतीय आता मराठी माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयीवरुन लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे. मुंबईतही घटकोपरमध्ये मराठी माणसावर होणार अन्याय समोर आला आहे.
मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी हा वाद सातत्याने होताना दिसत आहे. घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी- गुजराती वाद टोकाला गेला आहे. घाटकोपरच्या एका सोसायटीमध्ये मराठी कुटुंबीयांना खालच्या दर्जाची भाषा वापरून गुजराती लोकं त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीत दोन चार मराठी कुटुंब सोडली तर सगळे जैन, मारवाडी आणि गुजराती आहेत. हे बाकीचे सगळे मराठी माणसाला मांसाहार करण्यावरुन त्रास देत होते. शाह नावाच्या एका व्यक्तीने मांसाहार करण्यावरुन संबंधित कुटुंबाला, ‘मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो’, असे म्हटले. सततच्या या त्रासाला कंटाळून शेवटी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी नागरिकांनी मनसेकडे तक्रार केली. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी राज पार्टे यांनी या सोसायटीमध्ये धाव घेत गुजराती नागरिकांना चांगलाच दम भरला. तेव्हा शाह नावाची व्यक्ती समोर आलीच नाही. तर सोसायटीतील इतर रहिवाशी आम्ही मराठी विरुद्ध अमराठी भेदभाव करत नाही, आम्ही मांसाहार खाण्यावर कोणतेही बंधन आणत नाही अशी सारवासारव केली. यावेळी पार्टे यांनी यापुढे असं अजिबात खपवून घेणार नाही, तुमचा जो शाह आहे, त्याला तुमच्या भाषेत समजवा. जर तुम्हाला महाराष्ट्र गंदा वाटत असेल, तर मग इथे आलातच का? इथं मिळून मिसळूनच राहावं लागेल,’ असं ठणकावून सांगत मनसेने मराठी अस्मितेचं समर्थन केलं. याठिकाणी परत जर मराठीचा मुद्दा आला तर ४ हजार मराठी लोकं याठिकाणी येऊन तुम्हाला जाब विचारतील.’, असं देखील राज पार्टे यांनी सांगितले आहे. मनसे पदाधिकाऱ्याने यासंदर्भातील पोस्ट केली असून त्यामुळे मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे नवा गदारोळ माजण्याची शक्यता आहे. दरम्यान मनसेच्या या कृतीचे समर्थन देखील होत आहे.
काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये परप्रांतीय कुटुंबांनी बाहेरुन गुंड आणून मराठी कुटुंबाला मारहाण केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मराठी माणसांना मुंबईत चुकीची वागणूक दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे घरातच मराठी माणूस परका होत असल्याचे चित्र दिसत आहे.