
आमच्याकडे २३७ आमदार, ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील
भाजपाचा शिंदे गटाला इशारा, महायुतीत शिंदे गटाची घुसमट, पवारांनतर भाजपाकडूनही शिंदे गटाला दुय्यम स्थान?
नांदेड – राज्यात महायुतीचे सरकार असले तरी त्यात भाजपाचा वरचष्मा आहे. भाजपाचे स्वतःचे १३२ आमदार असून अपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपाकडे १४५ च्या पुढील संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपा सातत्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष्य करत असतात. पण आता भाजपाने एकनाथ शिंदे गटाला स्पष्ट इशारा देत फटकारले आहे.
नांदेडमध्ये तांडावस्ती निधी वाटपावरून भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिवसेना आमदार बाबुराव कदम यांनी नाराजी व्यक्त केली होती. अतुल सावे यांनी निधी वाटप करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी वाटप केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मंत्री अतुल सावे माझ्या मतदारसंघात आल्यावर मी आंदोलन करुन त्यांना विरोध करणार असल्याचा इशारा बाबुराव कदम यांनी दिला होता. त्यावर अतुल सावे यांनी कदम आणि पर्यायाने शिंदे गटाला इशारा दिला आहे.ते म्हणाले, मी आमदारांच्या नाराजीची खूप काळजी करत नाही. आमच्याकडे २३७ आमदार आहेत, आम्ही युतीत काम करतोय, ज्याला युतीत राहायचंय त्यांनी राहावं, ज्यांना नाही राहायचं, त्यांनी बाहेर पडावे असा निर्वाणीचा इशारा दिला. त्याचबरोबर तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठीचे प्रस्ताव आमदारांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविले अपेक्षित आहे. ज्यांचे प्रस्ताव आले, त्यांना निधी दिलेला आहे. यापूर्वी मी स्वत आमदार तुषार राठोड यांना १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी दिलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कदम हे पहिल्यांदाच निवडून आलेत, त्यांना प्रस्ताव कुणामार्फत येतात किंवा कोण मंजुरीला पाठवतो, याची पडताळणी करावी, अगोदर त्याची माहिती घ्यावी, असा सल्लाही आमदार बाबुराव कदम यांना दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील वाद समोर आला आहे. याआधी देखील एसओडी नेमणूकीवरुन फडणवीस यांनी शिंदे गटाला डावलले होते. दरम्यान अलीकडे अजित पवार आणि फडणवीस यांच्यातील जवळीक वाढली असून एकनाथ शिंदे मात्र वेगळे फडल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये निधीवाटपावरुन अंतर्गत धुसफुस असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांन निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप करत शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
अतुल सावे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अतुल सावे यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटाचे नेते कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.