
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, वांद्रे पूर्व भागातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर विश्वास टाकण्यात आला असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, विधानपरिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक होते. दरम्यान, यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने उमेदवारी नाकारताना विश्वासात घेण्याचा साधं सौजन्यही दाखवलं नसल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली होती. यावर आता मंत्री दत्तात्र भरणे यांनी स्पष्टीकऱण दिलं आहे.

अमोल मिटकरी यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. पक्षाचा कोणताही निर्णय हा सर्वांना विश्वासात घेऊनच घेतला जातो असं स्पष्टीकरण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या निर्णयावरुन पक्षात नाराजी असल्याच्या चर्चांना आता भरणे यांनी पूर्णविराम दिला आहे. बाबा सिद्दीकी आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं मुंबईसाठीचं योगदान आणि काम खूप मोठं आहे. झिशान सिद्दीकी हे देखील मुंबईचे आमदार राहिले आहेत. त्यामुळे केवळ भावूक होऊन नाही, तर सिनिअरिटी आणि मेरिट पाहूनच सुनेत्रा वहिनींनी हा निर्णय घेतल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.


