
पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूने संपूर्ण मुंबई हादरली असताना, आता या प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार मिळण्यात झालेला सुमारे साडेपाच तासांचा विलंब हा त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असावा, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नेमकी घटना काय?

जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यावर कुटुंबातील चौघांनाही पोटदुखी, उलट्या आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेतल्यावर त्यांना थोडा आराम मिळाला, मात्र काही वेळाने प्रकृती पुन्हा खालावली.

साडेपाच तासांचा तो ‘काळ’ ठरला जीवघेणा?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक चर्चेनुसार, प्रकृती गंभीर असतानाही रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवण्याऐवजी ते घरीच थांबले. रुग्णांना सकाळी ११ ते पावणे १२ च्या सुमारास जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात उपचाराचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. डोकाडिया कुटुंबाच्या बाबतीत याच काळात उपचार न मिळाल्याने विषबाधेची लक्षणे अधिक तीव्र झाली.
अन्नात ‘मॉर्फिन’चा संशय?
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तीव्र स्वरूपाची विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांना अन्नामध्ये ‘मॉर्फिन’सारखे धोकादायक विषारी पदार्थ असण्याचा संशय आहे. मात्र, ही विषबाधा नेमकी कलिंगडामुळे झाली की अन्य कशामुळे, याचा अंतिम निष्कर्ष अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल.
पोलीस तपासात काय समोर आलं?
जे.जे. मार्ग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सुमारे १२ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.विषशास्त्र अहवालआल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल. अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे (उलट्या, जुलाब) दिसताच घरगुती किंवा प्राथमिक उपचारांवर अवलंबून न राहता, तात्काळ मोठ्या रुग्णालयात तज्ज्ञांचा सल्ला घेणे जिवावर बेतणारे प्रसंग टाळू शकते.

