
शिर्डीतील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला संशयित अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शिर्डी पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर, मंगळवारी राहाता न्यायालयाने खरातला ९ मे पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे शिर्डीतील जमीन माफियांचे धाबे दणाणले आहेत.

नेमकं प्रकरण काय?
शिर्डी परिसरातील चार एकर जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठी फसवणूक झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणात अशोक खरातसह अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ फसवणूकच नाही, तर या व्यवहारात बेकायदेशीर खाजगी सावकारकीची गंभीर कलमेही लावण्यात आली आहेत.

असा मिळाला ताबा
अशोक खरात हा आधीच नाशिक येथील ‘विशेष तपास पथका’च्या (SIT) कोठडीत होता. शिर्डीतील या विशिष्ट गुन्ह्याच्या तपासासाठी शिर्डी पोलिसांनी सोमवारी त्याला नाशिकमधून ताब्यात घेतले. त्यानंतर आज (मंगळवारी) त्याला कडेकोट बंदोबस्तात राहाता न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयात काय झाले?
सरकारी वकील अॅड. गौरव बोर्डे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. “जमीन व्यवहारातील फसवणुकीचे धागेदोरे शोधणे, व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाण आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे,” असे त्यांनी नमूद केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
चौकशीकडे सर्वांचे लक्ष
अशोक खरातच्या अटकेनंतर आता शिर्डी आणि परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस कोठडीत होणाऱ्या चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात आणि फसवणूक झालेल्यांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

