
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सलग उपोषणामुळे गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती कमालीची खालावली असून, यामुळे संपूर्ण मराठवाड्यासह राज्यभरात मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे. सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक आक्रमक व तीव्र होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

गुरुवारी ४ जिल्ह्यांमध्ये बंदची हाक; धाराशिवमध्येही इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आणि आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (३ सप्टेंबर) मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांत ‘कडकडीत बंद’ पुकारण्यात आला आहे.या बंदमध्ये नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन आंदोलकांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास धाराशिव जिल्हाही बंद करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मराठा समाजाने दिला आहे.

काय बंद राहणार?
बाजार समित्या: कालच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातील चारही जिल्ह्यांतील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यापारी पेठा: विविध व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्याने बाजारपेठा व दुकाने बंद राहतील.
वाहतूक: मराठा कार्यकर्त्यांकडून प्रमुख महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक रोखली जाण्याची शक्यता आहे.
काय सुरू राहणार ?
वैद्यकीय सेवा: सर्व रुग्णालये, वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने (मेडिकल्स) नियमित सुरू राहतील.
शिक्षण क्षेत्र: शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
नित्य सेवा: दूध पुरवठा, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) आणि इतर सर्व अत्यावश्यक सेवा बंद काळात खंडित होणार नाहीत.
राज्यभरात रस्ता रोको आंदोलनाचा भडका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांत आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार रस्ता रोको आंदोलन केले.जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडीगोद्री फाट्यावर पुलावर ठिय्या मांडत आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी परिसर हादरवून सोडला. गाडी सोडण्याच्या कारणावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकही झाली.लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला व गुरुवारचा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयासमोर बालाजी पाटील कदम बटाळकर हा मराठा तरुण गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग उपोषणाला बसला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
“आजच तोडगा काढा!”, मराठा समाजाची मागणी
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनत चालल्याने सरकारने कोणत्याही परिस्थितीत आजच तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. जर सरकारने दिरंगाई केली तर संपूर्ण राज्यात आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

