
कोकणवासीयांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी २,९०० मोफत एसटी बसेस रस्त्यावर; मध्य रेल्वे चालवणार ३४ विशेष गाड्या
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी आणि चाकरमान्यांसाठी राज्य सरकार आणि मध्य रेल्वेने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागासाठी तब्बल २,९०० एसटी बसेसच्या सेवेचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे, या बसेसमधून प्रवाशांसाठी मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गणेशोत्सव ही राज्याची संस्कृती आणि ओळख : एकनाथ शिंदे

या उपक्रमाचा शुभारंभ करताना उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक महत्त्वावर विशेष भर दिला. “गणेशोत्सव हा केवळ सण नसून तो महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. सणासुदीच्या काळात गाड्यांची प्रचंड गर्दी आणि तिकिटांची होणारी मारामारी लक्षात घेता, भाविकांना गावोगावी पोहोचताना कोणताही त्रास होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे. दरवर्षी ही मोफत बससेवा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असा पुनरुच्चार शिंदे यांनी केला.तसेच, सणाव्यतिरिक्त इतर दिवशीही महिलांना एसटी बसच्या तिकिटांमध्ये ५० टक्के सूट देण्याचा निर्णय सरकारने आधीच लागू केला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

रेल्वे प्रवाशांनाही मोठा दिलासा! मध्य रेल्वे चालवणार ३४ विशेष गाड्या
केवळ एसटीच नाही, तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांसाठीही आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवातील अतिरिक्त गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेने ३४ विशेष गाड्या (Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचा बाप्पाच्या आगमनाचा प्रवास अधिक सोपा आणि सुखकर होणार आहे.

