मुंबई दि २३ (प्रतिनिधी) – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. विधानभवनाच्या बाहेर एकाने व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित व्यक्ती बरीच भाजली आहे.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेचे पडसाद विधानभवनात उमटले असून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.
सध्या विधानभवनात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे कडेकोट सुरक्षा तैनात असते.तरीही या व्यक्तीने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. पण आग विझवण्यात आली तेव्हा या व्यक्तीचे संपूर्ण अंग काळेठिक्कर पडले होते. या व्यक्तीने नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्मदहन केले याचा शोध पोलीस घेत आहे. शेतक-याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष भानुदास देशमुख असे शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीसंदर्भात असलेल्या वादातून हे आत्मदहन करण्यात आले असावे अशी शक्यता आहे. यावरून विधानसभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षाने यावेळी विधानसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वप्रथम हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. मात्र, विधानसभा अध्यक्ष हे अजित पवार यांना बोलू देत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले होते. यावेळी जोरदाग गोंधळ झाला त्यामुळे फडणवीस यांना निवेदन सादर करावे लागले.