
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय डाव साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी राज्यमंत्री विनायक पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.ठाण्यातील शिंदे गटाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात पाटील यांनी ‘धनुष्यबाण’ हाती घेत महायुतीत प्रवेश केला. लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणारे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय होते.

पाटील यांच्यासोबत लातूरमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.या प्रवेशामुळे लातूर ग्रामीणसह जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार असून आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेतल्याचे सांगितले.(Maharashtra Politics)

बच्चू कडूंना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र शिवसेनेतील काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. कडूंना उमेदवारी द्यायची असेल तर त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करावी, अशी अटही काही नेत्यांनी मांडली आहे.राजकीय समीकरणांनुसार, बच्चू कडू शिवसेनेत दाखल झाल्यास विशेषतः विदर्भात पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीसह विदर्भ पट्ट्यात कडू यांचे मजबूत जाळे असून शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो. त्यामुळे हा निर्णय शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकतो.


