नागपूर दि १०(प्रतिनिधी) – “मी तुम्हाला सांगतो हे सरकार-बिरकार फार भरवशावर राहू नका यांच्या. मी सरकार म्हणून सांगतो तुम्हाला”, अशा उपहासात्मक शब्दांत नितीन गडकरी यांनी जोरदार टोलेबाजी करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. अलीकडे नितिन गडकरी सतत आपल्याच सरकारवर टिका करताना दिसत आहेत. तसेच त्यांना निवडणूक कार्यकारिणीतून वगळल्यानंतर भाजपात आलबेल नसल्याचे चित्र आहे.
नितीन गडकरी नागपूरमध्ये झालेल्या अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी गडकरींनी शेतकऱ्यांना उत्पादन आणि बाजारपेठ यासंदर्भात मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी मालासाठी बाजारपेठेचं गणित कसं जुळवून आणायचं, यावर विनोदी पद्धतीने भाष्य केले आहे. गडकरी म्हणाले की, “मी ठरवलंय की माझ्या गाडीतून दररोज माल रात्री १० वाजता भाजीमार्केटमध्ये येईल.. ६०० किलो, ८०० किलो. तो मला २५ रुपयांच्या वर रेट देतो. मला आरामात ३०-४० हजार रुपये दोन दिवसाला मिळतात. माझं मार्केट एस्टॅब्लिश झालं. आता मला भाजी विकायला अडचण नाही. मी माझं मार्केट स्वत:च शोधलं. तुमचं मार्केट तुम्ही शोधा,हे सरकार-बिरकार फार भरवशावर राहू नका यांच्या. मी सरकार म्हणून सांगतो तुम्हाला” अस म्हणत आपल्याच सरकारवर निशाना साधला आहे.
“मुलगा झाला तर लगेच लोक म्हणतात, अरे वा, परमेश्वरानं दिला. आरे बाबा तुझं लग्न झाल्यानंतर तू पुढचा काही कार्यक्रम केला नसता तर मुलगा कसा झाला असता? अशी मिश्कील टिप्पणी देखील गडकरींनी केली आहे. गडकरी आपल्या सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत त्यामुळे ते वादातही सापडले आहेत.