
शिंदे फडणवीस सरकारमुळे राणा दांपत्याच्या अडचणीत वाढ
हनुमान चालीसा प्रकरणी सरकारचा न्यायालयात राणांना दणका, बघा काय घडल?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्यात सरकार बदलानंतरही भाजप समर्थक खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहे, असं राज्य सरकारच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी मुंबई गाठली होती. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. त्याचबरोबर राणा दांपत्याला पोलीसांनी अटकही केली होती. पण आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर राणा दांपत्याने मातोश्रीबाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणातील आमच्या विरोधातील गुन्हा रद्द व्हावा अशी मागणी केली होती. दाखल केलेली याचिका खोट्या एफआयआरवर दाखल होती, असा दावा त्यांनी केला होता. पण हा दावा पोलिसांनी फेटाळला आहे. त्यामुळे राणा दांपत्याला सध्यातरी दिलासा मिळण्याची शक्यता मावळली आहे. आता या प्रकरणी २८ एप्रिला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधातील मुख्यमंत्री अवमान प्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करत सरकाराने दिलासा दिला होता.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. नवनीत राणा या सुद्धा खासदार असल्याने त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. पण तरीही हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दांपत्य अडचणीत आले आहे.