‘..तर एकनाथ शिंदेंनी स्वबळावर पाच आमदार निवडून आणावे’
एकनाथ शिंदेना ठाकरे गटाचे आव्हान, मालेगावच्या पुढच्या आमदाराची केली घोषणा
नाशिक दि २५(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदेना आव्हान देखील दिले आहे. यावेळी त्यांनी मालेगावच्या शिवसेना आमदाराची घोषणा देखील केली.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेवर आणि राजकारणाच्या सद्य स्थितीवर निशाना साधला. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरली आहे. त्यांनी स्वतः पक्ष स्थापन करून त्याचे पाच आमदार निवडून दाखवा. एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर टीका केल्या शिवाय शांत बसू शकत नाहीत त्यामुळेच उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व किती मोठं आहे हे समजतं असे म्हणत विरोधकांवर निशाना साधला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाशी सौदा करून एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्ह मिळवलं असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. केंद्र सरकारवर निशाना साधताना ते म्हणाले की, “जे आपल्या विरोधात आवाज उठवतील त्यांना न्यायालय, तपासयंत्रणांकडून नष्ट करायचं. विरोधक नष्ट करायचे हेच चाललं आहे. कालपासून देशात आणि राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या पाहता देशात लोकशाहीच राहिलेली नाही. अशा शब्दात संजय राऊतांनी टिका केली आहे. त्याचबरोबर मालेगावमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले, पण ते पळून गेले. पण आता पुढचे आमदार अद्वय हिरे असतील असे सूतोवाच संजय राऊत यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेविषयी बोलताना राऊत म्हणाले की, “लोक उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रश्मी ठाकरे देखील या सभेला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेनेचे नेते, पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात या सभेला उपस्थित असणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.