मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अखेर जाहीर करण्यात आली आहे. नाशिक , अमरावती पदवीधर आणि नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारीला मतदान, तर २ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता्ाधारी विरोधक आमनेसामने येणार आहेत.
राज्यात २ पदवीधर मतदारसंघ आणि ३ शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर आणि नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार यांचा कार्यकाळ संपल्यामुळे निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे –
निवडणुकीची अधिसूचना – ५ जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १२ जानेवारीपर्यंत
अर्ज माघारी घेण्याची मुदत – १६ जानेवारीपर्यंत
मतदान – ३० जानेवारी
मतमोजणी – २ फेब्रुवारी
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार रणजित पाटील यांची उमेदवारी याआधीच भाजपने जाहीर केली आहे. इतर जागांसाठी सर्वच पक्षांची चाचपणी सुरु आहे.दरम्यान विधान परिषदेत बहुमतात येण्यासाठी भाजपासाठी या निवडणुकीत विजय आवश्यक आहे. तर आपले वर्चस्व राखण्यासाठी महाविकास आघाडीला देखील विजय गरजेचा आहे.त्यामुळे तुल्यबल लढत पहायला मिळणार आहे.