
माजी आमदार असलेल्या नेत्याची काँग्रेसमधून हकालपट्टी
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी, पण समीकरणे बदलणार
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री व शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसीला ९ एप्रिल रोजी उत्तर मिळाले व या उत्तरावर समितीने चर्चा केली. देशमुख यांंनी आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्ल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात. आशिष देशमुख यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून त्यांना सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासीत करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, नाना पटोले यांच्याविरोधातील आशिष देशमुख यांनी वारंवार विधाने केली होती. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दरमहा एक खोका मिळतो, असा थेट आरोप त्यांनी केला होता.
तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशमुख यांच्या सिव्ह्ल लाईन्स येथील बंगल्यावर जाऊन नाश्ता केला होता. ही भेट राजकीय नसल्याचेही या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले होते. पण आता ते भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.