आमदाराची बंदुकबाजी ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला पेड गर्दी
अजित पवारांनी केली शिंदे फडणवीस सरकारची जोरदार धुलाई
मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रभादेवीच्या राड्यापासून मुख्यमंत्र्यांच्या सभेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे समर्थक भिडल्यानंतर आमदार सदा सारवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना अजितदादांनी जोरदार टिका केली. “अधिवेशन संपल्यापासून एक आमदार उठतो आणि खुशाल बंदुक काढतो. दादागिरी करतो. राज्याचं राजकारण आणि आपली संस्कृती नाही. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जे घडतं. तेच आपल्याकडे व्हायला लागलंय.मला या राज्यांची बदनामी करायची नाहीये. पण तसं आपल्याकडे व्हायला लागलंय. ते योग्य नाही” असं म्हणत अजित पवार यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.पैठण मतदारसंघ येथील मुख्यमंत्र्याच्या सभेसंदर्भात बाल विकास अधिकाऱ्याने काढलेलं पत्रक कालपासून वादाचा विषय होता. यावरूनच आता अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी जर अंगणवाडी सेविकांना, पर्यवेक्षकांना आदेश दिले जात असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. अशी पद्धत महाराष्ट्राची कधीच नव्हती.यावेळी सरकार स्थापन होऊन तीन महिने होत आले तरीही पालकमंत्री न नेमण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. याचवेळी त्यांनी राज्यातील लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाबाबत भाष्य करत राज्य सरकारचं याकडे लक्ष वेधलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसंदर्भात एक पत्र व्हायरल झाले होते. या पत्रात अंगणवाडी सेविकांना सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या पत्रावरून वाद निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाकडून हे पत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या सभेला पेड गर्दी होत असल्याची चर्चा रंगली आहे.