सणासुदीच्या काळात एसटी कामगार संपावर जाण्याची शक्यता
शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाने एसटी कर्मचारी संतप्त
मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- ठाकरे सरकारच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ संप पुकारला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याने संप स्थगित करण्यात आला होता. पण शिंदे सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भाजपाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला होता. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

शिंदे फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या आर्थिक तरतूदीस कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका कर्मचाऱ्यांना बसणार असून त्यांचे सणासुदीच्या काळात वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पुढील चार वर्षांसाठी ३६० कोटी रुपयांचा निधी देण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.एसटीचे प्रत्येत महिन्याला ४५० कोटींच्या आसपास उत्पन्न मिळते. यात एसटी यंत्रणा चालवण्यासाठी महिन्याला साधारण ६५० कोटींचा खर्च लागतो. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३१० कोटी, डिझेलसाठी २५० कोटी आणि इतर गोष्टींसाठी साधारण ९० कोटींचा खर्च लागतो. त्यामुळे उत्पन्नापेक्षा लागणाऱ्या वाढत्या खर्चासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा राहिला आहे. यात शिंदे फडणवीस सरकारने निधीमध्ये कपात केल्याने आता ऐन सणासुदीच्या दिवसात कर्मचाऱ्यांना आर्थिकर अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
शिंदे फडणवीस सरकारने निधीमध्ये कपात केल्याने आता ऐन सणासुदीच्या दिवसात आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचारी नवरात्र, दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात संपावर जाण्याची शक्यता आहे. एसटी कामगार संघटनेने पुन्हा एकदा संपाची चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार आहेत.