जामनेर दि २३(प्रतिनिधी)- जामनेर परिसरात मुले पळविणारी कोणतीही टोळी नसून सोशल मिडियावर फक्त अफवा पसरल्या जात आहे. या अफवांवर विश्वास ठेऊ नये.काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांनी केले आहे. जामनेर परिसरात मुले पळवणारी टोळी आल्यास मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.पण ती अफवा असल्याचे समोर आले आहे.
शिंदे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही बाबतीत कोणाचा संशय आल्यास गावातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच आपले बीट अंमलदार पोलीस, बीट अधिकारी व पोलीस स्टेशनसोबत संपर्क साधून माहिती द्यावी. परंतु कोणीही कायदा हातात घेऊ नये कारण तो गुन्हा आहे. असेही सांगितले आहे. कारण अलीकडच्या काळात राज्यात काही ठिकाणी गावात येणारे भिक्षेकरी साधू, ज्योतिषी आणि इतर फेरीवाले यांनाच मुले पळवणारी टोळी समजून मारहान करण्यात आली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे जामनेर पोलीसांकडून जनजागृती केली जात आहे.
पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांना शाळेत अथवा क्लासला एकटे न पाठवता स्वतः अथवा ज्या बस वाहनातून ते जाणार आहेत त्याची पूर्ण माहिती स्वतः कडे ठेवण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मुलांनीही अनोळखी व्यक्तीने दिलेले चॉकलेट, खाऊ किंवा इतर काहीही बाहेर खाऊ नये.असे सांगितले आहे. मुले पळवणारी टोळी आल्याचा मेसेज अफवा असल्याचे सिद्ध झाल्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी खबरदारी मात्र घ्यावी लागणार आहे.