‘या दिवशी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाची सुरुवात
छत्रपती संभाजी 'त्या' राजेंच्या सूचक ट्विटची चर्चा
तुळजापूर ३(प्रतिनिधी)- क्रांती दिनी म्हणजे ९ आॅगस्टला तुळजापूरला होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात, असे ट्वीट संभाजी राजेंनी केले आहे. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिरात दर्शनावरून झालेल्या प्रकारानंतर संभाजी राजे पहिल्यांदाच तुळजापूरमध्ये जाणार आहेत. त्याचबरोबर संभाजी राजे स्वराज्य संघटनेच्या बांधनीला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात…
भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला…#स्वराज्य
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 3, 2022
राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी १२ मे रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगितले. सोबतच स्वराज्य या संघटनेची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले होते. या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत, असेही संभाजीराजे म्हणाले होते. त्यामुळे संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर येथे नेमके काय केले जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात तुळजापूरमधून करण्याला कारण आहेत. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वाद निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते.