नागरिक साखरझोपेत असताना अचानक पुर आला आणि…
पुराचा थरारक प्रसंग कॅमे-यात कैद, वर्षाच्या शेवटचा दिवस ठरला संकटाचा
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- आज सर्वजन सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. पण त्याचवेळी सरत्या वर्षात कांही अप्रिय घटना देखील घडत आहेत. मुंबईतील घाटकोपरच्या मेट्रोल असल्फा परिसरात अचानक ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटली. ७२ इंचाची जलवाहिनी फुटल्याने तब्बल ४०० हून अधिक घरात पाणी शिरलं. या पाण्याचा प्रवाह इतका होता की, यात अनेक दुचाकी, घरांच्या आजूबाजूचे तसेच दुकांनासमोरील साहित्य वाहून जात मोठे नुकसान झाले आहे.
रात्रीच्या सुमारास लोक झोपलेले असताना अचानक ७२ इंचाची पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढा नागरिकांच्या घरात घुसला. पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की अनेकांचे साहित्य त्यात वाहून गेले एकंदरीत पुर आल्यासारखी परिस्थिती तयार झाली होती. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला होता. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पाण्याची पाईपलाईन फुटली त्यावेळी पाणी सुमारे १० फुटांपर्यंत उसळत होते. पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली पण अधिकारी गैरहजर होते असे नागरिकांना सांगितले. आता महापालिकेने तातडीने जलवाहीनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असून एन विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे. त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहेत. यापूर्वी ही जलवाहिनी फुटून घरे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
सध्या मुंबई मनपाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्ध पातळीवर या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र याचा फटका घाटकोपर, चांदीवली, साकीनाका इत्यादी परिसराला बसणार असून या विभागात काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी आज येणार नसल्याचे चित्र आहे.