
शिंदे गटाऎवजी सगळे आमदार भाजपात जाणार होते पण…
शिंदे गटातील या नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ, गाैप्यस्फोटाचे संकेत
मुंबई दि ३ (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीला स्वतला मुख्यमंत्री बनवायचा आहे. त्यासाठी १०० आमदार निवडून आणण्याचे त्यांचे अडीच वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. पण उद्धव ठाकरे ऐकायलाही तयार नव्हते. त्यामुळे आता शिंदे गटात सगळे आमदार तेंव्हा भाजपात जाणार होते. पण एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेबांची शिवसेना वाचली असा मोठा गौप्यस्फोट माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे मराठेद्वेष्टे आहेत. केवळ मराठा नेत्यांचा वापर करायचा. मराठा माणूस मोठा झालेला त्यांना आवडत नाही. जिथे जिथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सभा घेतील. तिथे तिथे जाऊन रामदास कदम सभा घेणार. खरे गद्दार कोण, खरे खोकेवाले कोण हे वास्तव लोकांना सांगणार आहे. मला ३ वर्ष बोलू दिले नाही. हम करे सो कायदा ही हुकुमशाही, मी मालक बाकी नोकर असा कारभार झाला. बाळासाहेब असताना सगळ्या नेत्यांशी बोलायचे. चर्चा करायचे त्यानंतर निर्णय घ्यायचे. परंतु आता ते राहिले नाहीत. इथ पक्ष फुटला, संपला चालेल परंतु शरद पवारांना सोडायचं नाही. अजितदादा सकाळी ७ पासून मंत्रालयात बसायचे. तो माणूस मास्टरमाईंड आहे. शरद पवार ६ वाजल्यापासून काम सुरू करतात आणि त्यांनी मंत्रालयात बसून राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. पण ठाकरे मंत्रालयाकडे फिरकलेही नाहीत
अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
कदम यांनी यावेळी आणखी एक गाैप्यस्फोट करणार असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले की,गुहागरमध्ये माझा पराभव करण्यासाठी मातोश्रीतून शिवसेना नेत्याला आदेश देण्यात आले होते. वेळ येईल तेव्हा नाव घेईन तेंव्हा भूकंप होईल.असे सांगितले त्यामुळे तो नेता कोण याची चर्चा आता रंगली आहे.