निवडणुक आयोगाचा उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांना धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, ममता बॅनर्जींनाही दणका
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष राहणार नाही. पण त्याचबरोबर ‘आप’ला मात्र राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्राबाहेर घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येणार आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीप्रमाणेच सीपीआय आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्व समिक्षेखाली आलं होतं. पण राज्यांमधल्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात. सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. तसेच इतर अनेक लाभ पक्षाला मिळत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आमि सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. दुसरीकडे देशभरात पॉवरफुल्ल कामगिरी करणाऱ्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने बहाल केला आहे.
एखादा राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्याला लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या २ टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून ११ जागा जिंकाव्या लागतात.