
“९-१० शिट्ट्यांनंतरही वाटाणा शिजत नाही…”; अंगणवाडी सेविकेने मांडली व्यथा, प्रशासनाने थेट निलंबनच केलं
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. अंगणवाडीत लहान मुलांसाठी येणाऱ्या पोषण आहाराच्या अत्यंत निकृष्ट दर्जाबाबत सोशल मीडियावर आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा (देवयानी) पारधी यांच्यावरच प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. अन्नधान्याचा दर्जा सुधारण्याऐवजी सत्य समोर आणणाऱ्या सेविकेवरच ही कारवाई करण्यात आल्याने आता नागरिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

“१० शिट्ट्यांनंतरही वाटाणा शिजत नाही…” – सेविकेने मांडली होती व्यथा

अंगणवाडी सेविका पारधी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लहान मुलांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे, याचे वास्तव मांडले होते. “मुलांसाठी येणारा पांढरा वाटाणा ९ ते १० शिट्ट्यांनंतरही शिजत नाही. यामुळे लहान मुलांची पोटं दुखतात. १ किलो लापशीसाठी पावशेर साखर दिली तर ती गोड कशी होणार? असा निकृष्ट आहार दिल्यास कुपोषण कसे थांबणार?” असा रोकडा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला होता. तसेच अन्न भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या या धान्याचीही तपासणी करावी, अशी विनंती त्यांनी केली होती.

सुधारणा करण्याऐवजी थेट निलंबनाची नोटीस
या व्हिडीओची दखल घेऊन पुरवठ्यात आणि धान्याच्या दर्जात सुधारणा करणे अपेक्षित असताना, संबंधित अधिकाऱ्यांनी थेट पारधी यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर “मी माझ्या अंगणवाडीतील मुलांच्या चांगल्या आहारासाठी प्रश्न विचारला, यात माझं काय चुकलं?” असा उद्विग्न सवाल विचारत त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.

