
‘श्रीमद् भागवत’ वाचले असते तर…; अजित पवारांच्या मृत्यूबाबत इस्कॉन अध्यक्ष डॉ. सूरदासजींचे वक्तव्य चर्चेत
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघाती निधनाबाबत अद्यापही सीआयडी (CID) कडून तपास सुरू आहे. या दुर्घटनेचे गूढ कायम असतानाच आता इस्कॉन मंदिराचे (ISKCON) अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेले एक वक्तव्य बातमीच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार यांच्यासोबत जे घडले ते अत्यंत दुर्दैवी होते, असे सांगतानाच श्रीमद् भागवत ग्रंथाचे नियमित वाचन करणाऱ्यावर अशी अचानक अपघाती वेळ येत नाही, असे वक्तव्य सूरदासजी यांनी माध्यमांशी बोलताना केले.

डॉ. सूरदासजी नेमकं काय म्हणाले?

“मी गेल्या आषाढी एकादशीला अजित पवारजींना माझ्या स्वतःच्या हाताने ‘श्रीमद्भागवत’ हा ग्रंथ भेट दिला होता. मी त्यांना विनंती केली होती की, कृपया हा ग्रंथ आवर्जून वाचा. पण मला पूर्ण खात्री आहे की त्यांनी तो वाचला नसावा. त्या दिवशी अनेक पत्रकारही त्यांच्या दालनात उपस्थित होते. मी त्यांना आशीर्वाद देत सांगितले होते की, हा ग्रंथ आवर्जून वाचा, याला इतर सामान्य पुस्तकांसारखे समजू नका,” असे सूरदासजी यांनी स्पष्ट केले. श्रीमद् भागवत ग्रंथात अपार आध्यात्मिक शक्ती असून त्याचे नियमित वाचन करणाऱ्या व्यक्तीवर अशी अचानक आणि अपघाती वेळ येत नाही, अशी आपली श्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचीन भरून निघणारी हानी
अजित पवारांसारख्या मोठ्या आणि खंबीर नेतृत्वाचे असे अचानक निघून जाणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि कधीही न भरून निघणारी हानी आहे, अशा शब्दांत डॉ. सूरदासजी यांनी आपला शोक व्यक्त केला.

