शिवसेना पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
निवडणूक आयोगाला निर्णय न घेण्याचे निर्देश, सुनावणी पुन्हा लांबणीवर
दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाबाबत कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करत आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवसेना कुणाची? हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे . यावर आज सुनावणी पार पडली.
शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे वाद सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला. एकूण ५ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी घेण्यात आली. शिंदे गटाच्या वतीने वकिल हरिश साळवे, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल, मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली. शिंदे गटातील आमदारांची अपात्रता, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव, शिंदे गट आणि शिवसेनेने बदलेला विधानसभेतील गटनेता, मुख्य प्रतोद आदी मुद्दय़ांवर दोन्ही गटांकडून दाखल झालेल्या सहा याचिकांवर सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणी सुरू आहे. यावेळी आपण राजकीय पक्षाकडे संपूर्ण दुर्लक्ष करू शकत नाही कारण ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे.
आता या प्रकरणाचा निकाल सोमवारी लागणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाला कोणताही निर्णय घेऊ नका असा आदेश न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय शिवसेनेसाठी दिलासा देणारा तर शिंदे गटाची चिंता वाढवणारा ठरणार आहे.