महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा, परिक्षा पुन्हा घेण्याची मागणी
प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या गरिब मुलांच्या स्वप्नावर पाणी फेरणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी
मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला आहे. या परिक्षेतील भ्रष्टाचार मोडून काढून परिक्षा पुन्हा घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, महाज्योतीच्या परिक्षेचा पेपर हा पुण्यातील एक खासगी संस्थेने टेस्ट सिरिज घेतली तोच होता, त्याच संस्थेच्या पेपरमधील प्रश्न महाज्योतीच्या पेपरमध्ये होते. अशा परिस्थितीत त्या संस्थेतील मुलांनाच प्रवेश मिळणार हे उघड आहे. मग गडचिरोली, यवतमाळ, किनवट, नंदुरबार, धुळे, जळगावसह राज्यातील इतर भागातील मुलांना प्रवेश कसा मिळणार? या भागातील मुलांनी काय करायचे? किंवा ज्या विद्यार्थ्यांनी त्या खासगी संस्थेचा क्लास केला नाही त्यांनी काय करायचे? हा प्रश्न आहे. प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगलेल्या सामान्य कुटुंबातील मुलांवर हा मोठा अन्याय आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष घालून महाज्योतीच्या परिक्षेत झालेला घोटाळा शोधून काढावा तसेच फेरपरिक्षा घेऊन मुलांना न्याय द्यावा अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेली महाज्योती सातत्याने वादाचा भोवऱ्यात असते. कधी अनुदान तर कधी परीक्षा यामुळे सातत्याने महाज्योती चर्चेत राहिली आहेत. नुकत्याच ‘महाज्योती’कडून यूपीएससी परीक्षेतही गोंधळ झाल्याने ती रद्द करण्यात आली.
महाज्योती’कडून एकही परीक्षा सुरळीत घेतली जात नाही, असे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेतही गोंधळ झाल्याने ती रद्द करण्यात आली. आता ज्ञानदीप अकॅडमीमुळे एमपीएससीच्या परीक्षेतही गोंधळ झाला. त्यामुळे ‘महाज्योती’ परीक्षा घेणाऱ्या संस्थांची निवड कुठल्या आधारावर करते हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या कारभाराविषयी उमेदवारांना शंका असल्याचा आरोप स्टुडंट राईट्स ऑफ असोसिएशनने केला आहे.