![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
ठाकरे गटातर्फे अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर कापूस फेकत खोक्याची घोषणाबाजी
कार्यकर्त्यांकडून खोके आणि कापूस फेकण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना मदतीची आस
जळगाव दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गारपीटीने शेतकऱ्यांना जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून धरणगाव तालुक्यात ते सायंकाळी पोहचले असता धरणगाव शहरात ठाकरे गटातर्फे सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकत निषेध करण्यात आला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कृषिमंत्री सत्तार हे जळगाव जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतांची पाहणी करण्यासाठी आले होते. पण सत्तार धावता दाैरा करत असल्यामुळे अनेक जण त्यांच्यावर नाराज आहेत. यावेळी सत्तार नुकसानीची पाहणी करून धरणगावहून जात असताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कापसाने भरलेले खोके त्यांच्या मोटारींच्या ताफ्यासमोर फेकून निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख वाघ यांनी कापसाला १० ते १२ हजार रुपये भाव मिळावा यासाठी आम्ही सत्तार यांना भेटून मागणी करणार होतो. मात्र, ते न थांबताच निघून गेल्याचे सांगितले. यावेळी ठाकरे गटाने पन्नास खोक्याची देखील घोषणाबाजी देखील केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.२५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार. तर, ३१ मे पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारांनी दिली आहे.