‘आपण विधीमंडळाचा कुठलाही अपमान केलेला नाही’
संजय राऊत यांचे हक्कभंग समितीला उत्तर, हक्कभंग समितीवर केले गंभीर आरोप
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, या वक्तव्यावरून संजय राऊत यांना हक्कभंगविषयक नोटीस देण्यात आली होती. संजय राऊत यांना हक्कभंग समितीतर्फे नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीला राऊत यांनी अखेर उत्तर दिले आहे.
आपण विधीमंडळाचा कुठलाही अपमान केलेला नाही, असं सांगताना आपल्याविरोधात रचलेला हा विरोधकांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी यातून केला आहे. संजय राऊत पत्रात पुढे म्हणतात की, हक्कभंग समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरुपाची असणं अपेक्षित होतं, पण समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांना स्थान दिलं आहे, हे संसदीय लोकशाही परंपरेला धरुन नाही. समितीतील सदस्यांवर अपात्रतेची टांगली तलवार आहे. आम्हाला सर्व पदं बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. त्यांनी शिवसेना निर्माण केली. त्यामुळे सध्या विधिमंडळात डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यामुळे हा गट विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे, असं कोल्हापुरातील १ मार्चच्या वक्तव्यात मी म्हटले. फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे, असं उत्तर संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. चोरमंडळातील सदस्यांवर सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. यापैकीच काहीजण हक्कभंग समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतरच हक्कभंग समिती कारवाई करू शकेल. विधिमंडळाचं हसं होऊ नये म्हणूनच मी हे परखड मत मांडलं. बाकी विधिमंडळात कोणत्याही चोरमंडळाला स्थान असून नये, ही लोकशाहीची परंपरा आहे. मी त्या परंपरेचा पालन करणारा एक नागरिक आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना माझ्याविरोधात डाव आखल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
हक्कभंग समितीत इतर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना स्थान आहे पण ठाकरे गटाच्या एकाही प्रतिनिधीला यामध्ये नाही, याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. याचवरुन संजय राऊत यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं या समितीत आता ठाकरे गटाचा कोणी प्रतिनिधीचा समावेश होईल का हे पहावं लागणार आहे. यावर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.