दिल्ली दि २८(प्रतिनिधी) – शिवसेना पक्ष कोणाचा याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. पण आमदार अपात्रतेच्या मुद्यावर मात्र न्यायालयात निर्णय होणार आहे मात्र इथेही उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला आहे. कारण आमदार अपात्रेवर आता दिवाळीनंतरच सुनावणी होणार आहे. कारण याबाबतची पुढची सुनावणी १ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबतही तेंव्हाच निर्णय होणार आहे.
न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या खंडपीठापुढे काल पहिली सुनावणी झाल्यानंतर आता पुढील सुनावणी १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुढील सुनावणीसाठी जवळपास महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, जैसे थे परिस्थिती ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तर, खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा निर्णय कोर्टाने निवडणुक आयोगावर सोपवला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग सध्याच्या परिस्थितीवर निर्णय घेऊ शकते तसे झाल्यास शिवसेनेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. अर्थात तातडीचा एखादा निर्णय घ्यायचा झाल्यास तारखेत बदल देखील होऊ शकतो पण दाखल याचिका तातडीची आहे का हा निर्णय न्यायालयच घेणार आहे. त्यामुळे शिवसेना सध्याच्या स्थितीत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे. पण सुनावणी लांबल्यास चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर घटनापीठाने सुनावणीसाठी योग्य याचिका कोणत्या आणि निवडणूक आयोगासाठी कोणत्या याची काल वाटणी केली आहे. आता शिंदे गटाच्या आपात्रतेवर आणि इतर याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १ नोव्हेंबरपासून सुनावणी सुरु होणार आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला एकाच वेळी दोन ठिकाणी युक्तीवाद, पुरावे,सादर करत लढावे लागणार आहे.पण यामुळे शिंदे गटात उत्साहाचे तर ठाकरे गटात चिंतेचे वातावरण आहे.