
विरार आणि वसई परिसरातून अंधश्रद्धेचा फायदा उठवून एका असहाय्य महिलेवर अत्याचार केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलाला तंत्र-मंत्राने बरं करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका माऊलीच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिला जाळ्यात ओढले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात वसई किल्ल्यातील एका कुप्रसिद्ध भोंदू बाबाचे नाव समोर आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडित महिलेचा मुलगा गतिमंद आहे. मुलाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून ती चिंतेत होती. याच दरम्यान, आरोपी अजय कमलाकर राऊत याने तिच्याशी जवळीक वाढवली. “तुझ्या मुलाला तांत्रिकाकडे नेऊन तंत्र-मंत्राच्या साहाय्याने पूर्णपणे बरं करून देतो,” असा शब्द त्याने महिलेला दिला आणि तिचा विश्वास संपादन केला. मुलाच्या प्रेमापोटी महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला. मात्र, आरोपी अजय राऊतने तिच्या या अंधश्रद्धेचा आणि अगतिकतेचा गैरफायदा घेतला. त्याने महिलेला अर्नाळा येथील एका रिसॉर्टमध्ये बोलावून घेतले आणि तिथे तिच्यावर जबरदस्ती करत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले.

वसई किल्ल्यातील भोंदू बाबा ‘अजय राणा’चे कनेक्शन!
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांसमोर एक अत्यंत धक्कादायक माहिती आली आहे. या प्रकरणात वसई किल्ला परिसरात मंत्र-तंत्राद्वारे लोकांवर उपचार करण्याचा दावा करणाऱ्या ‘अजय राणा’ नावाच्या भोंदू मांत्रिकाचे नाव समोर आले आहे. आरोपी अजय राऊत हा पीडित महिलेला याच भोंदू बाबाकडे घेऊन जाणार होता. धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदू मांत्रिक अजय राणावर यापूर्वीही एका तरुणीला जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटमध्ये त्याचा नेमका किती सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस या बाजूंनी करत आहेत तपास
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(१), ६९, ७५ आणि ७८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून तपास करत आहेत.
महिलांच्या भाबडेपणाचा फायदा!
अंधश्रद्धेतून महिलांवर अत्याचार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नाशिकमधील ‘अशोक खरात’ यानेही अशाच प्रकारे अनेक महिलांच्या भाबडेपणाचा आणि अडचणींचा फायदा उठवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले होते. पुन्हा एकदा विरारमधील या घटनेने अशा भोंदू बाबांचा आणि त्यांच्या दलालांचा खरा चेहरा समोर आणला आहे. नागरिकांनी कोणत्याही आजारावर किंवा समस्येवर मंत्र-तंत्राचा वापर करणाऱ्या भोंदू बाबांच्या थापांना बळी पडू नये. अशा प्रकारचा कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

